महागाईने कंबरडे मोडलेल्या नागरिकांना आता महावितरण वीजबिलात स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार आणि इतकेच काय तर पुन्हा वीज शुल्क असे नाना तऱ्हेचे भुर्दंड आकारून अक्षरशः लुटत आहे. यामुळे दर महिन्याचे बिलाचे आकडे फुगत असल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त होत आहे. महावितरणच्या म्हणण्यानुसार, हा जरी वीजबिलाचाच भाग असला तरी या नावाने वेगवेगळे शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे बिलाच्या एकूण रकमेत वाढ झाली आहे. वीज वहन आकार दीडशे दोनशे, अडीचशे आणि त्यापुढे सुद्धा ग्राहकांच्या बिलात शुल्क समाविष्ट केले आहे. स्थिर आकार शंभर रुपयांच्या वर तर वीज शुल्क दोनशे, अडीचशे, तीनशे असे बिलात समाविष्ट आहे.
ग्राहकांना विविध आकार आणि शुल्काच्या नावापोटी लावलेली वेगवेगळी रक्कम गोंधळात टाकणारी आहे. वीज बिलात वहन आकारासोबतच स्थिर आकार आणि वीज शुल्क वसूल करण्यात येत होता. आता त्यात आणखी वाढ झाली आहे. वहन आकाराचे आकडे बुचकळ्यात टाकणारे आहेत. हा दर १.१७ रुपये प्रमाणे आकारण्यात येत आहे. इतकेच “ नव्हे तर वीज शुल्क १६ टक्के आकारण्यात येत आहे. त्यामुळे बिल आणखी वाढल्याच्या तक्रारी ग्राहकांच्या आहेत. बिलातील स्थिर वीज आणि वहन आकार तसेच वीज शुल्क नेमके काय आहे हे ग्राहकांना कळतच नाही. ते सरसकट येणारी बिलांची ते रक्कम पाहतात.
बहुतांश ग्राहकांना हे विविध आकार कशामुळे लावण्यात आले याची माहितीच नसते. वीजबिल न भरल्यास पुरवठा खंडित केला जातो त्यामुळे ग्राहकांचा नाइलाज आहे. वाढणाऱ्या बिलामुळे ग्राहकांमध्ये महावितरण विरोधात रोष व्यक्त होत आहे. १ एप्रिलपासून वीज दरवाढ झाल्याने सर्वच आकारात वाढ झाली आहे. त्यामुळे बिल भरमसाट यायला लागले आहे. ही दरवाढ २२ टक्के आहे. मुळात महाराष्ट्रात इतर सर्वच राज्याच्या तुलनेत वीज दर आधीपासूनच जास्त आहेत. त्यात पुन्हा भर पडली आहे. सरकार, आयोग आणि महावितरणची ही अकार्यक्षमता आहे. याचा सामान्य ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.